Thursday, December 10, 2015

78 th  post  1) ज्याचें जया  ध्यान  2) गोविंद गोविंद । मना लागलिया छंद॥)
 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
 Contact mail address is rgphadke@gmail.com
 For English Readers a separate post with same Abhangas  has been added..

अभंग १ ला :- 
ज्याचें जया ध्यान । तेंचिं होय त्याचें मन ॥१॥ म्हणूनी अवघे सारां । पांडुरंग दॄढ धरा ॥ २ ॥
सम खूण ज्याचें पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥३॥ म्हणें नभा । परता अणूचाहि गाभा ॥ ४ ॥
अभंग २ रा:-
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद॥१॥ मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ २॥
आनंदले मन । प्रेमें पाझरती लोचन॥ २॥ तुका म्हणें आळी । जेंवी नुरेंचि वेगळी ॥ ४

अभंगांचा शब्दार्थ :-
अभंग १ ला :- ज्याला ज्या वस्तूचे ध्यान लागते , तसे त्याचे मन होते. म्ह्णून ( हे प्रापंचिक जनहो तुम्ही ) मनाने पांडुरंगाचे स्मरण दृढभावाने करा. तो सर्वव्यापी असूनही समचरण जोडून ( तुमच्यासाठी ) विटेवर उभा आहे व ही त्याची खूण लक्षांत असू द्या. तुका म्हणतो की तो भगवंत आकाशापेक्षाही थोर असून शिवाय अणुरेणूंच्याही मधे आहे 

अभंग २ रा :- गोविंदाच्या नावाचा छंद मनाला लागला की मग अशा माणसाठीसाचा ( भक्ताचा ) देह पण गोविंद स्वरूपच होतो. त्याच्यामधे व भगवंतात कांहिच फरक राहात नाही. त्याचें मन आनंदित होते व भगवंतावरच्या प्रेमामुळे त्याच्या नयनांतून अश्रू वाहायला लागतात. जसे कुंभार माशीचा ध्यास घेतलेली आळी कुंभार माशीच होते. ( तसेच असा भक्त देवापेक्षावेगळा रहात नाही.)
अभंगाची पार्श्वभूमी :-
संत ज्ञानेश्वरमहाराजांनी एका ब्राह्मणास तुकाराम महाराजांकडे पाठवले होते. त्याला तुकाराम महाराजांनी जो उपदेश केला त्यातले हे दोन अभंग आहेत. संत हे कालातीत असल्याने असे होणे अशक्य नाही . परमहंस योगानंदांच्या “ओटोबायोग्राफी ओफ अ योगी " ह्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाचा गुरू कोण हे पण ठरलेले असते. म्हणजेच त्या ब्राह्मणाला ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत झाला असेल व तो तुकाराम महाराजांना भेटायला आला असेल.. असोपण ह्या घटनेमुळे आपला फायदाच झाला आहे. कारण आपल्याला हे मार्गदर्शनपर अभंग मिळालेतसेच खरा देव कोणता व मोक्ष म्हणजे काय हे समजून जर भक्ती घडेल तर भक्त विहंगम मार्गाने जाऊ शकतो. कारण देवाबद्दलच्या प्रेमा बरोबरच सर्व दृश्याचे नाशवंतत्व कळल्याने त्याची दृश्यामधून आनंद ( विषयभोगांच्या मुळे मिळणार तात्पुरता क्षणीक आनंद ) मिळेल ही गैरसमजूत पण दूर होईल. परमार्थात असे आसक्तीरहीत होणे महत्वाचे आहे. विषयसक्तीच जीवाला जन्म-मृत्यूच्या बंधनात गुंतवते हे आपण सर्वजन जाणतोच. तुकाराम महाराजांचे दोनही अभंग ह्या भूमीकेवरच त्यांनी लिहिले आहेत

अ    अभंगाच्या अर्थस्पष्टीकरणासाठी लागणारी कांही माहिती :-) सर्वसाधारणत: आपण सर्वचजण, देव म्हणजे मंदिरातली अथवा देवघरामधली मूर्ती असे समजत असतो. अशी मूर्ती हे देवाचे सगूण पण अत्यंत मर्यादित रूप आहे. बाह्य दृश्याकडे पाहिले की असे आढळते की सर्व ग्रहतारे हे पण सगूणच आहे . ईशोपनिषद म्हणते त्याप्रमाणे हे सुद्धा भगवंताचे विराट रूप आहे. पण भगवंत ह्या दृश्यापेक्षा वेगळाच आहे.   
      हे भगवंताचे वेगळेपण स्वप्नाच्या दृष्टांताने समजू शकते. आपल्या स्वप्नसृष्टीतलॆ सर्व विश्व आपल्यामधूनच निर्माण झालेले असते व आपण त्यापेक्षा वेगळेच असतो . म्हणुन तर सुषुप्तीत म्हणजे गाढ झोपी गेल्यावर स्वप्नातील विश्व नष्ट होते. पण आपल्यावर त्याचा परीणाम होत नाही.
तसे    खरा भगवंत पण आपण पाह्तो त्या विराट स्वरूपाच्या पेक्षा वेगळाच आहे. तोच विश्वनिर्माता आहे. भगवंताचे वर्णन तीन शब्दांमधे करायचे झाले तर " तो सर्वज्ञ , सर्वशक्तीमान, व सर्वव्यापी आहे.” असे करता येते.
भगवंतासच आपण ईश्वर असे पण संबोधत असतो. सूर्याचे प्रतिबिंब जसे सर्व पाण्याच्या सर्व तुषारांमधे असते तसाच तो पण सर्व चेतन व अचेतन पदार्थांना व्यापून आहे व आपल्या पंचेंद्रियांच्या पलीकडचा असल्याने आपल्याला तो दिसत नाही ,अनुभवास येत नाही.
म्हणून भगवंताच्या अनेक मूर्तींमधे आपण त्याला पाहतो. अनेक रूपे असल्याने त्याची अनेक नांवे पण आहेत. थोडक्यांत सर्व सगूणाचे अधिष्ठान म्हणजेच ईश्वर,,भगवंत, परब्रह्म हाच आहे.

 २)  सर्व संत व उपनिषदे हेच सांगतात की आपला मनुष्यजन्म भगवंताची भेट घेण्यासाठीच खरेतर आहे व अशी भेट होणे म्हणजेच मोक्ष होय. मोक्षाचे दुसरे नांव सायोज्यमुक्ती . ह्यामुक्तीमधे आपण भगवंताशी ऐक्य पावतो व भगवंतासारखेच जन्ममृत्यातीत होतो. कोणत्यातरी भक्तीद्वारे हे साधते.) ह्या शिवाय तिसरा मुद्दा पुढीलप्रमाणे आहे.

वेदांतातली ज्ञानाची प्रक्रिया असे सांगते की " जेंव्हा माणुस एकादी वस्तू पाहतो तेंव्हा प्रथम तो त्यावस्तूशी एकरूप होतो. मग परत येतो व ह्याक्रियेमुळेच माणसाला वस्तूचे जान होते

ह्या पार्श्वभूमीवरूनच आपल्याला अभंगाच्या अर्थ समजतो व असा समजलेला अर्थच आता पुढे लिहित आहे
अभंगाच्या अर्थाचे स्पषटीकरण :-    
अभंग १ चे स्पष्टीकरण:-    
१ ल्या अभंगाच्या सुरवातीलाच "ज्याचें जया ध्यान । तेंचिं होय त्याचें मन।" ह्या चरणामधे तुकाराम महाराजांनी वर लिहिलेल्या माहितीतल्या वेदांताप्रणित ज्ञान होण्याच्या क्रियेचेच वर्णन केले आहेमहाराज येथे म्हणताहेत की जर तुम्ही भगवंताचे ध्यान कराल तर तुम्ही त्याच्याशी त्यावेळी ऐक्य पावाल ध्यान करण्यासाठी भगवंताचे सगुण रूपाचे आलंबन आवश्यक असते. आपण जेंव्हा ह्या सगूण रूपाचे ध्यान करतो तेंव्हा आपले मन आपोआपच भगवंताशी ऐक्य पावते. पण ही अवस्था क्षणकालच टिकणारी आहे. त्यामुळे आपण पुन: दृश्याच्या भानावर येतो व एकदा कां दृश्याकडे आलो की दुसर्या विषयाकडे मन लगेच धाव घेते. मग भगवंताशी घडलेले ऐक्य भंगते.   
ह्यावरचा उपाय एकच जो सर्व शास्त्रे व संत सांगतात . तो असा की प्रयत्नपूर्वक आपण ह्या दृश्याच्या पसार्यामधून मनाला परत भगवंताकडे वळावायचे. हे मनाला वळवणे फक्त अभ्यासानेच करता येईल

ह्या अभ्यासातला एक सोपा भाग म्हणजे सतत नामस्मरण करत रहाणे. म्हणुनच अभंगाच्या पुढच्या चरणामधे " म्हणूनी अवघे सारां । पांडुरंग दॄढ धरा॥२॥ " तुकाराम महाराज आपल्याला पांडुरंगाला दृढ धरा अर्थात सतत भगवंताचे स्मरण करा असे सांगत आहेत.  

हे स्मरण सतत कसे करायचे? जसे भक्त धुवाने केले तसे कां ? पण मग त्यासाठी आपल्याला संसार सोडून वनातच जावे लागेल ! पण तरीही असे सतत स्मरणे कठीणच! खरेतर संतांनी आपल्याला आपली कर्तव्यकर्म करणे सोडा असे कधीही सांगितलेले नाही. गीतेमधे पण भगवंत अर्जूनास युद्ध कर हेच सांगतात.  
असे विचार व प्रश्न अर्थातच मनाला पडतात. त्यांचे उत्तर पहाण्यापूर्वी अभंगाच्या खालील चरणांचा अर्थ पाहणे उचित ठरते.   
सम खूण ज्याचें पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥३॥ म्हणें नभा।परता अणूचाहि गाभा॥४॥   परमार्थाच्या आचरणामधे सतत भगवंताचे स्मरण आपल्यामधील अहंभाव जाऊन तेथे भगवंताविषयी अत्यंत नम्रभाव अनन्यता यायला हवी.  
जेंव्हा आपण भगवंताचे विराट रूप ध्यानी घेऊ तेंव्हाच असा भाव आपोआपचे उपजतो.  
येथे पांडुरंगाचे अर्थात भगवंताचे वर्णन करताना तुकाराम महाराज आपल्याला मर्यादित देवघरातल्या सगूण रूपाकडून, भगवंताच्या विराट सगूणाकडे व तेथून अव्यक्ताकडे नेत आहेत.  

आपण वावरतो ती सर्व सृष्टी अवकाश (Space) म्हणजे नभामधे उभी आहे. भगवंत तिच्याहून विराट आहे. तसेच भगवंत अणू रेणूंपेक्षाही सूक्ष्म आहे. म्हणुन अभंगात " नभा परता व अणूचा गाभा " ह्या शब्दांनी तुकाराम महाराजांनी भगवंताचे वर्णन केले आहे.
असा हा खरा भगवंतच सर्व विराटाचे तसेच सूक्ष्म सगूणाचे म्हणजेच सर्व सृष्टी़चे मुख्य व एकमेव अधिष्ठान होय. भगवद्‍ गीतेमधे भगवान म्हणुनच सांगतात की परब्रह्माच्या एका अंशावर हे विश्व उभे आहे. तोच खरा कर्ता करविता आहे.  

आता आपल्याला अशा भगवंताचे स्मरण सतत कसे ठेवता येईल ते पाहता येते. ह्यासाठी तीनच मुख्य मुद्दे आहेत.   

) भगवंत सर्वव्यापी आहे म्हणून सर्वांशीच प्रेमाने वागावे. शक्यतो समाजातल्या सर्वाचे भले कसे करता येईल त्यासाठी आपला हातभार असावा.   

) आपण जे कांही काम करतो ते त्याची पूजा आहे ह्याभावाने नीटपणे करावे. काम करताना हा भाव असला की त्याचे स्मरण आपोआपच घडते. तसेच ह्या पूजेचे फळ काय मिळेल ही चिंता करावी लागत नाही. योग्य ते फळ भगवंत देतोच.   

) तसेच योजनापूर्वक भगवंताच्या कोणत्याही नामाचा जप करावा. ह्यामुळे आपल्याला त्याची आठवण सतत राहते.   

असे वागणे हेच वाचिक व शारिरिक तप होय.

असे वागणे जमण्यासाठीच रोज नियमितपणे प्रयत्न करावे, वेळोवेळी आपण योग्य दिशेने जातो आहोत की नाही ह्याच आढावा पण घेणे महत्वाचे आहे. कॊणतीही गोष्ट सवयीने जमू शकते. सवय लागायला साधारणत: ६ ते ८ आठवडे लागतात. त्यानंतर मग सोपे जाते.

सवय़ीचा परिणाम कसा असतो ते मागे एका अभंगाच्या स्पष्टीकरणामधे येऊन गेले आहे म्हणून पुनरावॄत्ती येथे केलेली नाही. वारंवार एखादी गोष्ट केली की शरीराला त्याची सवय लागते. नामास्मरणाची पण सवय स्वत:ला लावता येते. असो.   

अभंग २ चे अर्थ स्पष्टीकरण:   
हा अभंग वरील अभंगाप्रमाणे आचरण केले अर्थात भगवंताचे नामस्मरण केले व, त्याच्या भेटीचा ध्यास लागला की काय परिणाम होतात हे सांगणारा आहे. मुख्य होणारा म्हणजे भगवताविषय़ी प्रेमभाव निर्माण होतो. असा प्रेमभाव निर्माण होणे ही फार मोठी व उच्च्दर्जाची स्थिती होय. अशी स्थिती झाली की फक्त भगवंताचेच रूप सर्वत्र अनुभवास येऊ लागते. अशा भक्ताच प्रपंच भगवंतच चालवतो. (योगक्षेमं वहाम्यहम् असे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात) )  

ह्या अभंगात तुकाराम महाराजांनी " गोविंद गोविंद " ह्या नामाचे स्मरण करायला सांगित्रले आहे. जसे पांडुरंग, श्रीराम हे भगवंताचे नाम आहे तसे गोविंद आहे असे वरकरणी वाटते. पण गोविंद ह्यानावाचा अर्थ " जो इंद्रियांचे नियमन ठेवतो/ करतो तो " असा पण अर्थ आहे व हाच भाव मनामधे धरून जर भगवद्‍स्मरण केले तर भगवंतच आपली बाह्य विषयांकडे धावणारी वृत्ती आवरेल व मग दृश्याची आसक्ती आपोआपच कमी होईल. असा ह्या व आधीच्या अभंगाचा संबंध पण स्पष्ट होतो. भगवंताचा ध्यास कसा असावा हे समजावे म्हणुन " कुंभार माशीने आपल्या घरट्यात नेऊन ठेवलेल्या आळिचे " उदाहरण तुकाराम महाराजांनी दिले आहे. अशा आळिला कुंभारमाशीविना ईतर कांही दिसत नाही. शेवटी अशी ही आळि पण कुम्भार माशीच होते.  तसेच भक्ताचे बाबतीत होते व भक्त आणी भगवंत एकरूप होतात. भक्ताला सायोज्यमुक्ती मिळते.   

अभंगांची शिकवण :-
भक्ती कशी असावी व करावी ह्यासाठी ह्या अभंगांमधून आपल्याला तुकाराम महाराजांचे मार्गदर्शन मिळालेले आहे. त्यानुसार आपण आपले आचरण करायला हवे, स्वत:ला नमस्मरण करण्याची आग्रहाने सवय लावून घ्यावी; हीच अभंगाची शिकवण आहे.






0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home