Saturday, May 17, 2014

मराठी ६४वे  post अभंग :-  म्हणशीं होऊनि निश्चिंता । हरुनियां अवघी चिंता 
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com

म्हणशीं होऊनि निश्चिंता । हरुनियां अवघी चिंता ॥ मग जाऊं एकांता । भजन करूं ॥ १॥
संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईल तुझ्या ॥ २॥
सेकीं नाडसील नाडसील । विषय्संगे अवघा नाडसील । मागुता पडसील। भवडोहीं ॥ ३॥
शरीर सकळ मायेचा बांधा । यासीनाही कदा आराणूक । ॥ ४ ॥
करिती ताडातोडी अंतर बाह्यात्कारीं । ऐंसें जाती चारी दिवस वेगां ॥ ५ ॥
मोलाची घडी जाते वायाविण । न मिळे मोल धन देतां कोडी ॥ ६ ॥
जागा होईं करीं हिताचा उपाय । तुका म्हणें हाय करिसी मग ॥ ७ ॥

अभंगाचा शब्दार्थ :-

जर तू म्हणशील की मी निश्चिंत होऊन मग एकांतात भजन करेन तर संसारातल्या भ्रमामुळे आशा पाठीशी लागेल व तुझी कुचंबणाच होईल ॥ १ +२॥
शेवटी विषयसंगामुळे तू नाडला जाशीला व भवडोहामधे बुडशील ॥ ३॥
हे शरीर शेवटी मायेमुळेच घडले आहे , याला कधीच विश्रांती नसते ॥ ४ ॥
धावपळिमुळे तुझ्या आयुष्याचे दिवस भराभर जातील ॥ ५ ॥
ह्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे, कवडि देऊन अनमोल धन मिळत नाही ॥ ६ ॥
तुका म्हणतो की जागा हो , स्वत:च्या हिताचा उपाय कर अन्यथा हायहाय करत मरशील ॥ ७॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठी लागणारी माहिती :-

ह्या अभंगाचा अर्थ समजण्यासाठी त्यामागची भूमिका वगैरेची खरेतर मुळिच आवश्यकता नाही

अभंगाचा अधिकारी कोण आहे ? अभंग कोणासाठी आहे ?एवढे मात्र पाहाणे योग्य आहे.

बरेच वेळा आपल्याला हे पटलेले असते की भगवद्‌भक्ती केलीच पाहिजे. पण अनेक कामे , उपाधी आपल्या मागे लागलेल्या असतात. कांही आप्ण लाऊन घेतलेल्या तर कांही जगण्यासाठी आवश्यक असतात.
ह्या सर्वामधे आपण भगवद्‍भक्तीला दुय्यम स्थान देतो. अशा आपल्या सारख्या जीवांसाठी केलेला हा तुकाराम महाराजांचा कळकळीचा उपदेश आहे.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-

तुकाराम महाराज म्हणताहेत की जर तुम्ही म्हणाल की सर्व कामे आटोपली की मी निश्चिंतपणे एकांतात जाऊन भगवंताचे भजन भक्ती करेन , तर असे करणे अत्यंत कठीणे आहे. कारण ह्या शरीरामागे लागलेल्या निरनिराळ्या उपाधींमुळे तुम्हाला एकांतात जायला वेळच मिळणार नाही .
त्यामुळे जरी मनाला फार पटले असेल की भगवद्‍भजन भक्ती करावी तरीही हे तुमच्याकडून होणार नाही. कारन मन विषयांमगेच लागलेले आहे. ह्यामुळे एवढे मात्र नक्की की तुम्ही सतत ह्या भवसागरांत बुडून जाल. शेवटी ह्या कुचंबणेतच सर्व आयुष्य संपेल. तुम्ही हे लक्षांतघ्या की आय्ष्यातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे. तसेच फक्त माणसालाच भक्तीकरून मोक्षाची प्राप्ती करून घेण्याची क्षमता देवाने दिलेली आहे . म्हणुन हा नरदेह अत्यंत मोलाच खरेतर अनमोल आहे. त्यामानाने विषयांपासुन मिळणारी सर्व सुखे ही कवडिमोल ठरतात. म्हणुन जागे व्हा. नरदेहाची अशी ही अनमोल संधी व्यर्थ घालवू नका. अन्यथा हाय हाय करण्याविना दुसरे कांहीही हाती लागणार नाही.


अभंगाची शिकवण :-
आतापर्यंत जरी आयुष्य भगवद्‌भक्तीविना घालवले असले तरीही आता तरी शाहाण्या माणसाने पुढे असे न वागणेच श्रेयस्कर आहे.







0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home