Friday, December 12, 2014

71 A post Date 13/12/2014
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in.
Contact mail address is rgphadke@gmail.com For English  Readers a separate post has been added..

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥ १॥
येणें सोस मन झालें हांवभरी । परत माघारी येते नाही ॥ २॥
बंधना पासूनी उकलली गांठी । देत आलो मिठी सावकाश ॥ ३॥
तुका म्हणें देह भरला विठ्ठलें । कामक्रोध केलें घर रितें ॥ ४॥


शब्दार्थ :-
माझी मनस्थिती अशी झाली आहे की फक्त विठ्ठलाचेच नांव घ्यावेसे वाटते. विठ्ठल हाच माझा जीवभाव आहे, ॥ १॥
हीच माझ्या मनाला लागलेली हाअ आहे. व ह्या ईच्छेमुळे मनाला दुसरे कांहिहि नको आहे ॥ २॥
विठ्ठलाला घातलेल्या मिठीमुळे माझी सर्व बंधनांतून सुटका झाली आहे ॥३॥
सर्व देह विठ्ठलमय झाला आहे व त्यामुळे काम व क्रोध ह्या विकारांनी हे शरीर सोडले आहे ॥ ४॥


अभंगाचा अर्थ समजण्यासाठीचि पार्श्वभूमी :- ह्या अभंगाचा अर्थ दोन प्रकारांनी लावता येतो.
) तुकाराम महाराजांची साक्षात्कारानंतर( ब्रह्मज्ञान झाल्यावर) झालेली स्थिती ह्या अभंगामधून प्रगट होते.
) ब्रह्मज्ञान झाल्यावरच सर्व दु:खामधून सुटका होते हे आपण जाणतोच.म्हणुन आपल्याला ही स्थिती येण्यासाठी काय करावे लागेल त्याचे मार्गदर्शन ह्याच अभंगाद्वारे मिळते.
म्हणून येथे हे मार्गदर्शन काय असावे ह्यावरच जेवढे समजले ते लिहित आहे.
येथे श्री नामदेव महाराजांचे दोन अभंग पाहणे उचित ठरेल. तुकाराम महाराजांचा अभंग ह्याच स्वरूपाचा आहे व मागे आपण पाहिला आहे.( संदर्भ : - अभंग "कां रे नाठविसि कृपाळू देवासी"  post  १ ले. Aug 2012 मधे हे पोस्ट केले आहे ) म्हणुन येथे नामदेव महाराज यांचे अभंग घेतले आहेत.

तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे। सुर्यासी चालणे तुझिया बळे॥
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी । वर्म हें जाणुनि शरण आलो ॥
मेघांनी वर्षावें पर्वती बैसावें । वायूने विचरावे सत्ते तुझे ॥
नामा म्हणें कांही न हाले साचार । प्रभू तू निर्धार पांडूरंगा ॥ १ ॥

अच्युता अनंता श्रीधरा माधवा । देवा आदि देवा पांडुरंगा ॥
कृष्णा विष्णु गोविंदा वामना । तूचि नारायणा नामधारी ॥
मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा । नाम सदाशिवा शांतरूपा ॥
रूपातित हरी दाखवीं सगूण । निरंतर ध्यान करी नामा ॥ २ ॥

अभंगाची भाषा व अर्थ सरळच आहे. पहिल्या अभंगात नामदेव महाराज हेच सांगताहेत की सर्व सृष्टीचे व्यवहार भगवंताच्याच सत्तेखाली होत असतातअगदी झाडाचे पान सुद्धा त्याच्या ईच्छेविना हालत नाही.

पुढच्या २ îrÉÉ अभंगामधे ह्यादेवाचे स्वरूप कसे आहे ते सांगितले आहे.
पण असा हा खरा देव ( आदिदेव) खरेतर तो अव्यक्तच आहे पण आपल्यासाठी सगूण रूपांमधे आलेला आहे.
( समर्थाचा प्रभू श्रीराम, तुकाराम, नामदेव , ज्ञानेश्वरादि संतांचा पांडुरंग, मीराबाईचा श्रीकृष्ण ) . अभंगामधे नामदेवमहाराजांनी त्याची ईतर नांवे जशी अच्युत, अनंत, श्रीधर, माधव वानगीदाखल सांगितली आहेत

ह्या देवाचेच निरंतर ध्यान नामदेव महाराज करताहेत असे ते अभंगाच्या शेवटी म्हणत आहेत.

अभंगच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-

हेच निरंतर म्हणजे सतत अखंड ध्यान कसे करायचे ते तुकाराम महाराजांचा अभंग सांगतो.
अभंगाचे चरण :- बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल …..:
ह्यात आपल्याला हेच सांगितले आहे की आपण जे जे कांही पहात असतो ते सर्व कांही भगवंतच आहे.

हे समजण्यासाठी खालील विचार उपयोगी आहे.

मातीचा घडा करण्यास करणारा कुंभार, माती , पाणी तसेच शक्ती पण लागते. व ह्याच संदर्भात सॄष्टीनिर्मितीचा विचार थोडक्यांत खालील प्रमाणे आहे.

नासदिय सुक्तामध्ये सूक्तकर्ता म्हणतो तसे सुरवातीला भगवंताशिवाय ईतर कांहीच नव्हते. पुढे " एको॓हं बहुस्याम " असा आदिसंकल्प निर्माण झाला व त्यातून त्रिगूण
( सत्व, रज, तम) व पंचभूते निर्माण झाली. भगवंताने आपला अंश त्यात घातला व अनेक प्राणिमात्र निर्माण झाले.
एकूण काय तर भगवंतच सृष्टीनिर्मितीसाठी लागणारे सामान, शक्ती ,जान सर्वकांही झाला. ह्याचा अर्थ हाच की तो सगूण रूपाने प्रगट झाला. सर्वांभूती तोच वसतो आहे.

हे समजून सर्वांशी गॊड बोला , सर्वांमधे भगवंत आहेच व म्हणूनच सतत त्याचेच आपल्याला दर्शन होतेच आहे, हे लक्षांत घ्यावे. त्यासाठी आपल्या मनामधे भगवंताच्या भेटीचीच आंस असायला हवी. तोच आपल्याला सर्व दु:खांमधून कायमचा सोडवणारा आहे हे जर ध्यानी घेतले तर अशी आंस आपोआपच मनामधे निर्माण होते. ह्यालाच भक्तीचा उदय म्हणता येते.अभंगात तुकाराम महाराजांनी हेच म्हटले आहे की अशी हांव ( आस) त्यांच्या मनामधे आहे.

मन असे भगवंतमय झाले, सर्वांभूती तोच आहे हे मनापासून पटले की मग मुख्यत: मनामधले कामाचे विचार प्रथम नष्ट होतात. काम म्हणजे कामना करणे-हवे-नको हे सर्व उरत नाहीत. ह्याचे कारण हेच की  मनाची संपूर्ण खात्री झालेली असते की जे कांही मिळते ते त्याच्याच ईच्छेप्रमाणे व तोच माझी सर्व काळजी करतो आहे. ह्यामुळे जर कांही मनाप्रमाणे झाले नाही तरी वाईट वाटत नाही. कोणी कसेही बोलले तरी आपली वाचा कठोर होत नाही. तरीही क्रोधाचा आविष्कार जर झाला तरी तो ताब्यात ठेवता येतो.

अर्थात हे एका दिवसांत होत नसते. त्यासाठी सतत प्रयत्नच हवे. हे प्रयत्न म्हणजेच भगवंताचे स्मरण ठेवणे. ह्यासाठी सर्वांत सोपे साधन म्हणजे नामस्मरण करणे. त्याची आठवण सतत जागी ठेवणे. ह्यासाठी आपल्याला कोठेही वनामधे जायची गरज नाही. मनाची ही स्थिती यावी म्हणून न कंटाळता ; वर म्हटले तशी वागणूक आहे कां हे सतत स्वत:चीच परीक्षा करून पहाचे आहे व नंतर स्वत:ला सुधारायचे .

अभंगाची शिकवण :-

असे प्रयत्न आपण करावे हीच ह्या अभंगाची शिकवण आहे.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home